जेव्हा दिवसाची सुरुवात उदासीन होते

एखादा दिवस असा उजाडतो की दिवसाची सुरुवातच उदासवाणी होते, पुढे घडणाऱ्या घटना ही उदास मनस्थिती दूर करण्याऐवजी त्यात भरच घालतात. दिवस कसा बसा पुढे ढकलला जातो; पण जशी संध्याकाळ जवळ येते तसे मन अधिकच अस्वस्थ होऊ लागते आणि अशावेळी मला आठवण येते तोर्ड्याची. तोर्डा गाव आणि त्या गावातून वाहणारी खाडी अस्वस्थ मनाला हाक मारू लागते. मग मनाला पुन्हा तरतरी आणायला माझी पावले आपोआप तोर्डा गावाच्या दिशेनं वळतात.

तोर्ड्याच्या मनमोहक परिसराची पहिली भेट

पर्वरीतील माझ्या घराजवळून साधारण दोन-अडीच कि मी अंतरावरील ह्या सुंदर तोर्डा गावात पहिल्यांदा कधी गेले ते आता आठवत नाही. पर्वरीमध्ये राहायला आल्यानंतर कुठल्या तरी एका संकष्टीला तोर्ड्याच्या गणपतीचे दर्शन घ्यायला गेलो असता, देवळाच्या पुढून जाणाऱ्या रस्त्याने पाय मोकळे करण्यासाठी आम्ही गेलो आणि फिरत फिरत सुंदर अशा खाडीपर्यंत येऊन पोचलो. सायंकालीन संधी प्रकाश, संथ वाहणारे खाडीचे पाणी, रात्रीची विश्रांती घेण्यासाठी आपल्या नियोजित ठिकाणी परतणारे पक्षी. खाडीच्या एका बाजूला ओळींमध्ये उभे असलेले माड. असा तो सगळा देखावाच मोहवून टाकणारा होता.

तोर्डा गावातील खाडी
तोर्ड्याच्या फेरफटक्याचा लागला छंद

त्यानंतर मग असे अधूनमधून तोर्डा गावात जाऊन तोर्ड्याच्या गणपतीचे दर्शन, तिथून मग खाडीच्या मधून पुढे साल्वादोर द मुंद गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून थोडं पदभ्रमण आणि नंतर खाडीच्या काठावर काही वेळ शांतपणे बसून पाण्याला न्याहाळणे हा आमचा छंदच होऊन गेला. खाडीच्या काठावर बांधलेल्या पायऱ्यांवर किंवा कठड्यावर बसून; वाहत्या पाण्याचे ते तरंग, मधूनच एखादा तहानलेला उडता छोटा जीव पाणी पिण्यासाठी पाण्यावर झेप घेतल्यानंतर निर्माण होणारा भोवरा, काठाजवळच्या पाण्यातील सुळसुळ पोहणाऱ्या मासोळ्या, हे सारं पाहताना मन अक्षरशः हरवून जायचे. दिवसभरातील घटनाच नाही तर स्वतःलाच काही क्षण विसरून जाण्याचा आत्मिक आनंद घेऊन प्रफुल्लित मनाने मग आम्ही घरी परतायचो..

Torda Ganapati Devasthan
मन आकृष्ट करणारी गोव्यातील निसर्ग सुंदर गावे

तोर्ड्याच्या खाडीच्या अलीकडे असलेले तोर्डा गाव, तिथून थोडे पुढे पैठण आणि खाडीच्या पलीकडे असलेले साल्वादोर द मुंद अशी सगळी गावे निसर्गाच्या सावलीत वसलेली. चिंचोळे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा; चोहोबाजूनी अथवा पुढे मागे असणाऱ्या झाडांच्या मध्ये असलेली लाल कौलांची सुंदर गोवन घरे, असा गोव्यातील छोट्या गावांचा देखावा मला खूप आकर्षित करतो. साधारणपणे गोव्याबाहेरील लोकांची अशी समजूत असते की गोवेकर वेळ घालवायला नेहमी बीचवर जातात, सूर्यास्त पाहतात आणि दैनंदिन व्यापाचा थकवा दूर घालवतात. असा थकवा दूर करण्यासाठी गोवेकराला बीचवर जाण्याची गरज नाही.  पावलापावलावर निसर्ग त्याला खुश करण्यासाठी हाक मारत असतो.

तोर्डा गाव
पावलोपावलीचा निसर्ग हेच स्वर्गसुख

मला तर विशेषकरून अशी छोटी गावे, तेथील निसर्ग आणि शांतता, बीच पेक्षा अधिक आकर्षित करते. पर्वरी सारख्या शहरात राहूनही तोर्ड्याची खाडी आणि त्याच्या आसपासची गावे माझ्या घरापासून काही कि मी अंतरावर आहेत म्ह्णून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. त्यामुळे कधीही खूप कंटाळवाणें वाटले की बाईक काढायची आणि अशा गावातून रपेट मारायची, गावाचं सौंदर्य न्याहाळायचं, गावातील माणसे पाहायची, वाटेत कुठे छोटी नदी अथवा झरा लागला तर तिथे थोडे थांबायचे, पाण्यातील माशांची शिकार करण्यासाठी किंवा किनाऱ्यावरील मातीत असलेल्या किडयांना खाण्यासाठी फिरणाऱ्या पक्षांचे निरीक्षण करायचे, बस्स! माझ्यासाठी यासारखे दुसरे स्वर्ग सुख नाही.

Way to Salvador de mundo
small bridge on Torda Creek
वाढत्या गर्दीत हरवतेय शांतता

माझ्यासारखेच अनेक लोक इथे संध्याकाळ झाली की, सायंकालीन भ्रमंती करायला, नदीच्या काठावर बसून संध्याकाळच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला किंवा दिवसभराचे जगाला प्रकाश देण्याचे आपले कार्य आटोपून मावळतीला चाललेल्या सूर्याचे दर्शन घ्यायला येतात. बरेच जण, पाण्यात गळ टाकून मासे पकडण्यासाठी येतात. आजुबाजुचेच नाही तर दूर अंतरावरूनही काही लोक इथे येतात. याच गावात असणारे “गोवन घरांचे संग्रहालय” (Houses of Goa museum) हे पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग असल्याने, संग्रहालय पाहून काही पर्यटकसुद्धा इथे येऊ लागलेत. त्यामुळे पूर्वीची शांतता आता थोडी कमी होऊन गजबज वाढलेली आहे.

निसर्गसौंदर्याच्या जपणुकीसाठी एक विनंती

लोकांनी अशा निसर्गरम्य ठिकाणी येऊ नये असे नाही. पण खरोखरच तुम्हाला निसर्गाचे आकर्षण असेल तरच अशाठिकाणी यावे असे माझे ठाम मत आहे. सगळे जातात म्हणून, किंवा उगाच आपली लहर आली म्हणून अशा ठिकाणी जायचं, गर्दी करायची आणि खरोखरीचे निसर्गप्रेमी किंवा पदभ्रमण करणाऱ्या लोकांच्या आनंदात व्यत्यय आणायचा असं होता कामा नये. कारण बऱ्याचदा तरुण मुले मुली इथे उगाच गर्दी करतात, खायचे जिन्नस घेऊन येतात, काळोख होईपर्यंत थांबतात. आजूबाजूला पडलेल्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक आदी कचरा अशा सुंदर ठिकाणी पाहणं हे अत्यंत दुःखदायक असतं. शिवाय हा रस्ता कमी रहदारीचा आणि शांत असल्यामुळे, रस्ता अरुंद आहे हे विसरून अशा वेगाने बाइक्स आणि कार चालवत तरुण मंडळी जाते की कापरं भरतं.

माझ्या गोव्याच्या भूमीला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. ह्या मनमोहक निसर्गाला विद्रुप न करणं ही आपली जबाबदारी आहे याचं प्रथम सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. उगाच नको त्या गोष्टींसाठी अशा ठिकाणी गर्दी करणे टाळले पाहिजे. तरच अशा सुंदर निसर्गाचा मान राखला जाईल.

कॅटेगरी Goa

error: Content is protected !!